Saturday, March 28, 2015

रामनवमी

अयोध्येत लगबगत्या सुईणींची घाई
दीपकळी थरथरती कौशल्यामाई
अयोध्येत चैत्राचा तप्त स्तब्ध वारा
राजा दशरथाच्या अस्वस्थ येरझारा
अयोध्येत शुभयोग दाटले आभाळी
भाग्यचिह्न अंकण्यास रघुकुलाभाळी
अयोध्येत प्रासादी पुरजनांचा मेळा
हर्षभरे ये शरयू दाटुनिया डोळां
अयोध्येत पाळण्यात लालचुटुक पाय
गदगदली हर्षभरे कौशल्यामाय
अयोध्येत अवतरले आज रामराय
रघुवंशी रचते नियती स्वर्णाध्याय

- योगेेश

Friday, March 20, 2015

माझ्या हिश्शाचं पीपली लाइव.


http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/271366
जातींचा जिगसॉ.
बेलगाव, जि. बीड.
एप्रिल 2013.

दुष्काळावर डॉक्युमेंटरी करत फिरत होतो.

एप्रिलमध्ये 42 डिग्रींची काहिली.
चामडी बुटातनंही कातळावर पाय भाजत होते.
पाणी भरण्यामागचे सायास दाखवायचा प्रयत्न करत होतो.
टँकरच्या चेंगराचेंगरीत 83 वर्षांची आजी दिसली. अनवाणी.

तीनशे कदमांवर गावकुसाबाहेरचं घर, पण तितकं अंतर कापायलाही तिला वीसवीस मिनिटं लागत होती.
त्या दुखत्या सांध्यांनी पाणी शेंदणार, पाच पोहऱ्यांनी एक हंडा भरणार, आणि सात-आठ किलोंचा तो हंडा भेलकांडत घरी नेईपर्यंत इथे टँकर संपणार.
मी न राहवून त्यांचा हंडा उचलला.
या निमित्ताने पाणी वाहण्यासारख्या गोष्टीतला शिष्टाचारही शिकलो.

आजीच्या घरात आजारी नवऱ्याखेरीज कुणीही नव्हतं. कुणीही.
वाटेत जर्दा चघळत सलूनवर बसलेले रिकामटेकडे पुरुष होते,
घरच्या बाईला मदत नाही केली, हिला तरी कुठून केली असती?
त्याच वाटेवर, सायकलीला डब्बा टांगून पाणी नेणारा होता,
पण आजीला कॅरियरवर हंडा ठेवून घरापर्यंत नेऊ दिला नाही.

गावाच्या बौद्धवस्तीत पोचलो, आजोबा आजीला 'खाऊ-की-गिळू' असं पाहत होते.
युनिट पॅक-अप करवून गाडीत बसवलं.
डॉक्युमेंटरीत दाखवायला पुरेल इतकं शूट झालं होतं,
पण निदान आजचा दिवस तरी आजीला मदत म्हणून मी हंडे भरायला आजींबरोबर मागे फिरलो.
तीन हंडे भरल्यानंतर आजीनेच घालवून दिलं.

"बामणाकडून पाणी भरवल्याबद्दल गावात हफ़्ताभर हसतील. जावा दादा तुम्ही." आजी बोलली.
एका दिवसाच्या सोयीपेक्षा स्वाभिमानाच्या बेगडाखालची जातीय जोखड म्हातारीचे हाल करत होती.
****(या आजींचा प्रसंग खालील क्लिपमध्ये 09:09 पासून 10:10 पर्यंत)****
------------
शेजारच्या जालन्यात कर्जबाजारी होऊन जीव देणाऱ्या कुंडलिक बनसोडेंचं घर, आणि शेजारीच नापिकीपायी मुलीची हळद लांबलेल्या डोंगरेंचं घर दिसलं होतं.
------------
या काहिलीत बीडच्याच उमापुरात कोण कुणाचं पाणी कशावरून तोडत होतं हे ही नंतर कानी पडलं.
------------
हे सगळे गावाकडचे गरीब.
खरेखुरे गरीब मराठे. खरेखुरे गरीब बौद्ध. खरेखुरे गरीब माळकरी. खरेखुरे गरीब ब्राह्मण. खरेखुरे गरीब कुणबी.
सगळ्यांचा लसावि 'गरीबी'.
पण गरिबी, दुष्काळ आणि हालातही जातींच्या भिंती कोसळल्या नाहीत.
----------------------------------------------------------------------------
तात्पर्य (1) "गावाकडचे मराठे वंचित, त्यांचे हाल बघा!! आरक्षण हवंच!!!" म्हणणाऱ्यांनी गावातील इतर वंचित जातीही पाहाव्यात. वंचित दलित, वंचित सवर्ण. यांची नातवंडंही घरची कामं करून एकाच शाळेत शिकत असतील, तर संधीही समान हव्यात.
तात्पर्य (2) मराठा आरक्षणावर बोलणाऱ्या पत्रकारांच्या जातीवर घसरणाऱ्या मावळ्यांनी (सोकॉल्ड) 'मनुवादी' (सोकॉल्ड) 'बामनशाही' मीडिया गावाच्या दुर्दशांकडे दुर्लक्ष करतात असं बोलू नये.
तात्पर्य (3) जाणते राजे गरिबी सरसकट बघू शकत नाहीत, त्यांना फारफार 73 टक्के जाणते म्हणेन.

टचस्क्रीन

टचस्क्रीनों से पटा ये डिब्बा
नज़रें नहीं मिलाता
अपने अपने जग में डूबी
आंखें नहीं उठाता
कुछ के हाथ में फ़ोन है अपना
पर नज़रें हैं भटकीं
पराये स्क्रीन पे चलती फिल्म में
इनकी सांस है अटकी
यह भी ख़ूब कि अपना मॉडल
क्यों न किसी को भाये,
क़ीमत और औक़ात में काहे
फर्क़ समझ ना आये
फर्ज़ी गेम में दौड़-भाग कर
जितने सिक्के बटोरे
उतने भिखारी बगल से गुज़रे
लेकर ख़ाली कटोरे
चैट की चौपाल में चलता
घंटों तक 'तियापा
देख न पाये सीट की आस में
कब से खड़ा बुढ़ापा
बात का ज़रिया बात की ही
जड़ पे है यूं बन आया,
टचस्क्रीनवालों का ये मजमा
दिल को न टच कर पाया
Written on my Samsung phone.

भगव्या आठवणी

25 जानेवारी 2013-
बाळासाहेबांनतरच्या पहिल्या वर्षातली शिवसेना...

http://khabar.ndtv.com/video/show/ndtv-special-ndtv-india/263067

'जातीयवादी' बालगीते ;)

देशस्थ बालगीत
रात्रीचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले दोन,
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
तात्पर्य- मी नाही(च) अभ्यास केला
----------
कोकणस्थ बालगीत
रात्रीचे वाजले आठ
पुरा केला गृहपाठ
एका मिनिटात बॅग भरली
दोनावर सुई फिरली
आठ वाजून दोन
बाबांचा आला फोन,
हे काय, नुसताच मिस्डकॉल केला,
मी नाही रिटर्न केला
आठ वाजून तीन
ताईची हरवली पीन
बोलणी खाण्यात अर्धातास गेला
मग नऊस्तोवर तपास केला
तात्पर्य - आठ वाजताच अभ्यास झाला. बाकी कंजुशीवर घसरलात तर पुढे पाणीही विचारणार नाहीत. wink emoticon

Friday, March 06, 2015

'उत्क्रांती'

माकडांची उत्क्रांती झाली,
भाषा आली, शेपूट गेले,
झाडांवरतून उतरून मग
एकमेकांच्या छाताडावर चढले
एकेकाळी मुक्त विहरती
जे झाडांच्या शिखरांवरती
मोठ्या मोठ्या उड्या मारती
हल्ली ते निष्कर्षांवरती
फिरत नागडे तरी कधीही
इज्जत त्यांनी लुटली नाही
पण मग चढले कपड्यांचे थर
तरी वासना सुटली नाही
त्या आधी पृथ्वीवर जेव्हां
डायनोसॉर बोकाळले होते
उल्कांच्या दैवी डस्टरने
पृथ्विफळ्याला पुसले होते
शंभर वर्षांपूर्वी देवा
तशीच संधी तुजला होती
पण तू विज्ञानाचे कोलीत
देऊन बसला माकडा हाती
उलट्या उत्क्रांतीची आता
वर तू बसुनी मजा पहा
देह नराचा, आत्मा माकड
माणुसकीचा ॐफट् स्वाहा!

Tuesday, March 03, 2015

राजपुत्राची घर-वापसी

इंद्रप्रस्थात झालेल्या प्रतिपानीपतच्या-चवथ्या-लढाई नंतर राजपुत्र गायब झाला होता. राजमाता मम्मीमॅडमवर तडिताघात झाला. आत्ता कुठे राजवस्त्रं त्यागून ती वानप्रस्थाला जाणार तो तिच्या क्लांत हातांत राज्यशकटाचे दोर परत येऊन पडले.
दौलतीची झीज तिळातिळाने होत होती. गुर्जरकुंजर नरेन्द्रवर्मांच्या सैन्याने मोठ्या महसुलाचे सगळे सुभे काबीज केले होते. तंजावर प्रांतीच्या मांडलिक जयंतीराजे राजपुत्र आणि जुन्या सरसेनापतींवर चिडून वेगळ्या झाल्या होत्या.
दौलतीत कुठेच काही घडत नव्हतं. विरंगुळा म्हणून सुभ्यांचे सुभेदार बदलून झाले. दख्खनेच्या सुभ्यावर माहूरगडाचा सरदार आल्यापासून तळकोकणच्या सरदाराने निर्वाणीचा चौथा इशारा दिल्याचं ऐकलं. राजमाता खूप दिवसात एव्हढी हसलेली पाहिली नाही. त्यानंतरही हसलेली कुणाला दिसली नाही. ती बेपत्ता राजपुत्राच्या चिंतेत आकंठ बुडाली होती.
प्रजेला राजपुत्राचं जाणं कळलं होतं. कुणी म्हणालं 'तो चवथ्या लढाईत धारातीर्थी पडला'. कुणी म्हणालं, 'नाही. त्याचा देह पडला नाही, पळाला. त्याच्या कोमल कांतीवर एक ओरखडा नाही, तो सुखरूप आहे.'
काळ थांबत नाही. कुणी म्हणालं राजकन्येलाच उत्तराधिकार देऊन राजमाता आपल्या माहेरी विठुकान्ह देशात नामस्मरणात कालक्रमण करतील. या बातमीने राजकन्येच्या फळीतील सरदार मोहरले. पण खुद्द राजमाता काहीच बोलत नव्हती.
इथे दुःखी प्रजेला राजकुमार दिसल्याचे साक्षात्कारही होऊ लागले. कुणी म्हणालं, 'तो गंगोत्रीच्या मुखाशी शांभवी उपचार घेत आहे', कुण्या बंदरावरील द्वारपाल म्हणाला, 'राजकुमाराने वेशांतर करून यवद्वीपाकडे जाणारं एक गलबत गाठलं'. यवद्वीपावरील गणिकांची ख्याती भरतखंडात सर्वदूर होती. असो.
आणि एकेदिवशी राजधानीतील जनपथावर हाहाकार उडाला. साक्षात राजपुत्राच्या आगमनाच्या वार्तेने लोकांची प्रासादावर रीघ लागली. तेच लोभस बालसुलभ रूप, तसाच पिंगट केशसंभार, तसेच शांभवनेत्र, तीच श्वेतपास्तकांती, कपोलांवर तसेच श्मश्रुखुंट, शेकडो तरूणींना बुडवणारी हुबेहूब कपोलखळी. आनंदभरित राजमाता आरतीचं तबक घेऊन, दुखर्‍या गुडघ्यांची तमा न बाळगता करकर धावत आली.
राजमातेचे एकनिष्ठ सरदार जयराम संशयमुद्रा धारण करते झाले. राजपुत्राला सदरेवर थांबवून राजमातेला म्हणाले, 'राहुकाळ उलटेस्तोवर क्षेमकुशल पुसणे अशुभ असे. आपण देवडीत बसावे, आम्ही सदरेवर त्यांच्या फलाहाराची सोय करतो.'
लगोलग दोन हशम येऊन राजपुत्राला धरायला आले. त्यांच्या कळकट हस्तस्पर्षाने राजपुत्राची पांढरीशुभ्र बाराबंदी मळकट झाली. त्याने असा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकला, की खुद्द हशम दचकले. जेव्हां राजपुत्राने तोर्‍यात दोन्ही बाह्या झटकून वर केल्या, खुद्द सरदार जयरामांचा संशयही क्षणमात्र फिटला.
राजकुमाराने श्वेतवस्त्राआड झाकलेले बलदंड बाहू वर करून आज्ञा केली, "आता पकडा. वस्त्रे डागाळली तर देहदंड घडेल!". क्षणभर चपापलेल्या जयरामांनी म्हटलं,
"महाराजकुमार, बसा. यात्रा कशी झाली?"
"कसली यात्रा? या चिंतनावकाशात अंतर, काळ, कशाचं भान राहिलं नाही. किती मोत्ये खोटी निघाली, किती नाणी झिजली, इभ्रतीचा खुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही! सेनापति अजयकुमारांनी नावालाच हरताळ फासला, आम्ही अंबारीतून सगळं पाहिलं!"
"ते विसरा महाराज. आता रियासतीची नव्याने घडी बसवायची आहे. मातांनी आपल्या राज्याभिषेकाची तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी आपल्याला शपथेवर काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. युद्धावरून परतलेल्यांचा रिवाजच आहे तो, माझा निरुपाय आहे. ही तुळशी हाती धरा."
"तुळशी? ई! ती तर नरेन्दवर्मांची आवडती पत्री आहे! आम्हाला नको ती! आम्ही आता गंगोत्रीवर मजेशीर पत्री पाहिली. तिची शपथ खाऊन तुम्ही लिहून द्याल ते बोलू!"
"राजकुमार!" सुटलेल्या संयमावर लगाम देत जयराम वदले, "हास्यविनोदाचा हा प्रसंग नाही. मम्मीमॅडमला लवकर भेटायचंय ना?" असं विचारत त्यांनी राजपुत्राहस्ती तुलसीदले कोंबिली.
"सांगा- भरतखंडाला दूध कुणी दिले?"
"गुर्जरगोमातांनी!" राजपुत्र शांतपणे म्हणाला.
"सांगा- 'एका दिवशी मी रात्री उठलो' या विधानातील विसंगती काय?"
"हेहे! दिवसा रात्र असते का? काहीही!"
"राजकारण कुठल्या वस्त्रांमध्ये दडले आहे?"
"राजकारण आणि वस्त्राचा काय संबंध? राजकारण आपल्या मेंदूत आणि हृदयात दडले असते!"
"आता शेवटचा प्रश्न- ओळ पूर्ण करा.... 'बोलते जे 'अर्णव'"
"पीयुषाचे!"
"काय? 'अर्णव'वरून तुम्हाला बाकी काहीही आठवू नये?"
"काय??"
जयरामांचा चेहरा क्रोधित झाला. त्यांची आरोळी प्रासादात घुमली, "पकडा ह्या द्रोह्याला! आणि चार वर्षं कोठडीत डांबून ठेवा!"
जयराम लगोलग राजमातेकडे गेले, "माते, काळीज कठोर करून ऐकावं, हा आपला राजपुत्र नसून एक अत्यंत मेधावी तोतया आहे!"
राजमातेवर दुसरा तडिताघात झाला. तिच्या हातातलं तबक कलंडून जमीनीवर पडलं, तबकातील केशरी-पांढर्‍या-हिरव्या गुलालाच्या वाट्या इतस्ततः विखुरल्या.
माता अश्रु पुसत म्हणाल्या, "तुमची गर्जना प्रासादात घुमली तेव्हांच मला कल्पना आली. पण त्याला चार वर्षं डांबायला का सांगितलं? आत्ता वढेरबुरुजावरून कडेलोट करूयात त्याचा!"
जयरामांनी मातेकडे रोखून पाहिलं, "माते, शांत!"
"तोतया अत्यंत मेधावी आहे. महाराजकुमार परतले, तरी चार वर्षांनंतरच्या युद्धात या चतुर तोतयालाच उभं केलं, तरच काही सुभे परत मिळण्याची आशा आहे!"
राजमातेवर तडिताघाताची हॅटट्रिक झाली, पण ती पुन्हा हसली. तळकोकणातील चवथ्या बंडाळीच्या वर्दीनंतर हसली ना, हुबेहूब तशीच.
- योगेश